समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत
पुणे मेट्रो लाईव्ह :
इचलकरंजी ता.५,साहित्य आणि समाज यांचे परस्पर सबंध जिव्हाळ्याचे असेल पाहिजेत.त्यासाठी इतिहासाच्या वस्तुनिष्ठ मांडणी बरोबरच समकालीन प्रश्नांची चर्चा आणि त्याच्या सोडवणुकीची दिशा साहित्यातून समाजाला दिली गेली पाहिजे. साहित्यातून राजकीय ,सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक पर्यावरणाचा समतोल राखला जाणे फार महत्वाचे असते. सकस साहित्य हे सहीत नेणारे असते. ते वैश्विक आणि मानवतावादी असते. धर्म आणि राजकारण यांच्या सरमिसळी प्रमाणेच साहित्य आणि संकुचित राजकारण यांची सरमिसळही सामाजिक ,सांस्कृतिक एकतेला बाधा पोहोचवून अध:पतनाकडे नेत असते. याचे भान साहित्य निर्मिती व साहित्य व्यवहारांतून ठेवले गेले पाहिजे. जात ,पात, धर्म ,पंथ या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार आणि त्याच्या उत्थानाची मांडणी साहित्यातून झाली पाहिजे. साहित्यातील वास्तविकता आणि काल्पनिकता याचा अनुबंध माणूस जोडण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. सुदृढ समाज बांधणीचे काम साहित्यातून अभिप्रेत असते ,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
वर्धा येथील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि १७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षीय भाषणांवर आधारित हे चर्चासत्र झाले.
या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, तुकाराम अपराध,दयानंद लिपारे,पांडुरंग पिसे, डी.एस. डोणे ,देवदत्त कुंभार,मनोहर जोशी यांनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले की,साहित्यात समाजाला बरोबर घेत समाजाला पुढे नेण्याची मोठी ताकद असते.सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचे दर्शन त्यातून होत असते.साहित्य हे माणसावर कोणते ना कोणते संस्कार करत असते. साहित्य हे नेहमी मानवी जीवनातील विविधतेचा,गतिशीलतेचा शोध घेत असते. यावेळी न्यायमूर्ती चपळगावकर आणि चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षीय भाषणातील विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली.यावेळी महालींग कोळेकर,नारायण लोटके,अशोक. मगदूम,रामभाऊ ठीकणे,आनंदराव नागावकर,शहाजी धस्ते,सुरेश इंगळे आदी उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ लेखिका शांताबाई कांबळे,गायिका वाणी जयराम,उद्योजक हेमंत कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली.
Comments
Post a Comment