पुणे मेट्रो लाईव्ह :
अहमदनगर, 08 जूलै (जिमाका वृत्तसेवा) - शासकीय कार्यालयामध्ये येणा-या नागरीकांची शासकीय कामे प्रशासनातील अधिका-यांनी तत्परतेने पुर्ण करावीत. तसेच शासनाने सोपवून दिलेले कामे वेळेत पूर्ण करण्यावर अधिका-यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालक #सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी व्यक्त केली. आज #जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन, अतिवृष्टी, पर्जन्यमान बी-बीयाणे, खतांचा पुरवठा आदी विषयांबाबतच्या आढावा बैठकीत पालक सचिव श्री. भांगे बोलत होते.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, अपर जिल्हाधिकारी सोनाप्पा यनगर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित आदी विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालक सचिव श्री. भांगे पुढे म्हणाले, आपली शासकीय कामे वेळेत व्हावीत अशी जनतेची अपेक्षा असते. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने गतीमान व्हावे. जनतेची कामे वेळेत पूर्ण झाली तर जनतेच्या मनात शासनाबद्दल चांगली प्रतिमा निर्माण होते. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी प्रलंबित शासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावा. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर प्रशासनाने प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील जनतेच्या कामांचा तालुका स्तरावरच निपटारा होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. जिल्ह्यात कृषि विभागाचे काम समाधानकारक आहे. त्याच धर्तीवर इतर विभागानेसुध्दा प्रयत्न करावे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
शासनाला प्रशासनाकडुन ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या वेळेत पूर्ण झाल्या पाहिजे. जिल्ह्यातील कामकाज चांगले झाले तर त्यातुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन होणारी कामाची गुणवत्ता चांगली राखली जाण्यासाठी व कामे वेळेत पुर्ण होण्यासाठी अधिका-यांनी कामाच्या ठिकाणी भेटी देऊन शासनाच्या नियमाप्रमाणे कामे वेळेत पूर्ण करावीत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालक सचिव श्री. भांगे म्हणाले पावसाळ्याच्या काळात नागरीकांसाठी पुरेशी आरोग्य सुविधा, शुध्द पाणीपुरवठा, साफसफाई आदी आवश्यक कामांबाबत कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत याकडे तालुका व जिल्हास्तरावरील संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे. सामान्य रुग्णालय, शासकीय कार्यालयाच्या मोठ्या इमारतींमध्ये फायर सेफ्टी ऑडीट करुन घेण्यात यावे. ग्रामीण भागातसुध्दा पावसाळ्याच्या काळात कुठलीही समस्या निर्माण होणार नाही या दृष्टीने तालुका प्रशासनाने काम करावे. शेतक-यांना पीक पेरणीसाठी आवश्यक असलेले बी बीयाणे, खतांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी बैठकीत दिल्यात.
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, नियोजन, कृषि, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग, कौशल्य विकास, कामगार, विद्युत वितरण आदी विभागांचा कामांचा आढावा पालक सविच श्री. भांगे यांनी यावेळी घेतला. आजच्या बैठकीत विविध विभागांना कामकाजासंदर्भात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना पालक सचिव श्री. भांगे यांनी यावेळी दिल्यात.
Comments
Post a Comment