सुरेश भट यांनी गझलविधेला सामाजिक भान दिले
प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर यांचे प्रतिपादन
पुणे मेट्रो लाईव्ह :
कोल्हापूर ता.२६, गझल लेखनामध्ये तंत्रशरणता आणि तंत्रशुद्धता यांच्यामधली सीमारेषा ओळखता आली पाहिजे आपल्याला अभिप्रेत असलेला आशय तंत्रात बांधण्याचे कौशल्य गझलकाराकडे असले पाहिजे. हे चिंतन लोकाभिमुख असले पाहिजे. माधव जुलियन यांची कविता ही उत्तम कविता आहे. पण मराठीमध्ये शास्त्रशुद्ध गझलेचा पाया सुरेश भट यांनी घातला.तसेच आपल्या गझलेद्वारे मोठ्या प्रमाणावर सामाजिकतेचे भान दिले. तो पुरोगामी विचार आणि वारसा मराठी गझलेने आजच्या अस्वस्थ वर्तमानात अधिक ताकदीने पुढे नेला पाहिजे, असे मत मराठी गझलेचे पहिले संशोधक व गझलकार प्रा.डॉ.अविनाश सांगोलकर यांनी व्यक्त केले. ते गझलसाद संस्थेच्या वतीने लोकराजे शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या ' अविनाशपासष्ठी 'या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी सुभाष नागेशकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमांमध्ये डॉ.सांगोलेकर यांनी गझलविधेच्या संशोधनानिमित्त घडलेले काही किस्से,आठवणी यांचे विवेचन केले. तसेच आपली काही मते ही व्यक्त करत आपल्या गझलाही सादर केल्या.
लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करून गझलविधेबाबत भाष्य करताना ते म्हणाले, गझलेमध्ये दुर्बोधता हा दोष मानला जातो. लेखनामध्ये सहजता असली पाहिजे. अर्थात ही सहजता म्हणजे बाळबोधपणा नव्हे. तर काठीण्य पातळी टाळणे असते. मराठी गझल लिहिताना सुरेश भटांनी लिहिलेली गझलेची बाराखडी प्रमाण मानली पाहिजे.अर्थात अनेकानी विविध प्रयोगही केले. अर्थात रसिकांपर्यंत आपण लिहिलेली गझल पोहोचणे हे सर्वात महत्त्वाचे असते. डॉ. सांगोलकर यांनी आपल्या विवेचनात स्वरकाफीया यापासून मात्रावृत्तापर्यंत आणि मुसलसल गझलेपासून गझलेच्या अन्य प्रकारांपर्यंत अनेक बाबींचा वापर केला तसेच रसिकांच्या शंकांचे प्रश्नांचे निरसनही केले.
हे सारे विवेचन करत असतानाच का होते ही माझी घाई ती आल्यावर,पतंग माझा गोता खाई ती आल्यावर,माणूस मारणारे ते लोक कोण होते ? मूल्यास गाडणारे ते लोक कोण होते ?, कुठे लोकरी अस्सल चळवळ ,ऐकू येते केवळ खळखळ,सारा समाज हल्ली एकात्म आढळेना ,जातींमधून तो ही बाहेर का पडेना ?,
सारा समाज आता झाला बधिर आहे ,जो तो परंतु येथे वाचाळवीर आहे यासारख्या अनेक गझल व हजल सादर केल्या.
यावेळी डॉ.दिलीप कुलकर्णी,हेमंत डांगे, विहार सरदार,डॉ.दयानंद काळे,खलील मोमिन,संतोष अकोलकर,आप्पासाहेब मेथे पाटील, जीनरत्न रोटे,शिरीष कुलकर्णी,अविनाश शिरगावकर,सुभाष वाणी, विजया शिंदे,सौ.सुमित्रा कुंभोजकर,प्रसाद रेळेकर,सुशांत माजगावकर,सुरेश पाटील,बळवंत कुंभोजकर,सागर पवार यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.नरहर कुलकर्णी यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment